Shashank
"उद्या सकाळी सकाळी उठुन सात वाजता मी मतदान करुन येणार". मी बायकोपाशी जाहीर करुन टाकले. आज इ-मेल आली होती. कंपनी इज कमिटेड टु एनेबलिंग इट्स एम्प्लॉइज टु कास्ट देअर वोट. थँक यु फॉर एक्सरसाईजींग युवर राईट टु वोट. कंपनीने मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली होती. 'राईट टु वोट', हक्क ..हम्म.. मी मनाशी म्हटले. आपला हक्क आपण बजावलाच पाहीजे. 'परिस्थीती वाईट आहे' असे म्हणुन आपण नेहेमी शिव्या घालत असतो. आपले काम आपण कधी करणार. लेट मी कंप्लीट माय टास्क. त्या विचारातच घरी आलो होतो.

बरेच वर्षात सुट्टी असताना घड्याळात सकाळचे सात वाजलेले बघितले नव्हते. आज बघितले. मतदानाला जायचे आहे, मनात घोळत होते. "पण मत कोणाला देणार ?" बायकोने विचारले. मी ब्लँक. "घ्या, हे आहे ज्ञान तुमचे" मी स्वत:लाच म्हटले. लॅपटोप उघडला. मायनेता.इन्फो साईट उघडली. "वा..वा.. आधी बघायला काय झाले होते." पुन्हा एकदा स्वतःशीच बोललो.

"अरे बरेच लोक उभे आहेत की. चॉईस आहे आपल्याला मतदानासाठी. अरे वा..." मी म्हटले. "सध्याच्या सरकारने परिस्थीती वाईट करुन टाकली आहे. दुसरे ऑप्शन्स बघु. ". बाकीच्यांची माहिती बघितली. बरेचसे दहावी पास फक्त. काहींवर क्रिमिनल केसेस तर काहींवर गुन्हे दाखल.

मतदान करण्याचा उत्साह एकदम थंडावला. यांना मत देऊन काही होईल का भले देशाचे ? हा निवडुन आला काय किंवा तो, काय फरक पडतो ? पुन्हा मी मतदान केल्याने कसा फरक पडणार? सरकार बदलुन देशाने बघितलेच आहे की. काही फरक पडला का ? मुळातच चांगले लोक उभे राहतील निवडणुकीला असे का बघत नाही निवडणुक आयोग ?

जरा चार लोकांशी बोलुन बघु म्हणुन नऊ,दहा वाजेपर्यंत मित्र ऑनलाईन येण्याची वाट बघितली. त्याना प्रश्न विचारले. कोणाला मत देणार? प्रत्येकाची वेगवेगळी उत्तरे. परंतु 'परिस्थिती बदलेल' असा आत्मविश्वास कोणालाही नव्हता. बर्‍याच जणांनी गुन्हे असलेले उमेदवार उभे असणे हे अ‍ॅक्सेप्ट केले होते. "त्याकडे लक्ष देउ नकोस. सगळे गुन्हेगारच असतात, त्यातल्या त्यात बरा निवड". आता त्यातल्या त्यात बरा म्हणजे नक्की काय आणि तो नक्की कसा निवडायचा हे कोणीतरी मला नक्की सांगा. म्हणजे, विमानातुन उडी टाकण्यापेक्षा, इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन उडी टाकणे त्यातल्या त्यात बरे दिसत असले, तरी एन्ड रिझल्ट एकच आहे हे कसे समजत नाही लोकांना ?

"करु का कॅन्सल मतदान करणे?" पुन्हा एकदा मनाशी संवाद. मोबाईल वाजला. मित्राचा फोन. पुन्हा एकदा 'हक्क' वगैरेचे डिस्कशन. जाउदे, दुपारनंतर जाउ आता, गर्दी झाली असेल असे म्हणुन थोडे पुढे ढकलले. दुपारी चार वाजेपर्यंत निर्णय झाला नव्हता. मतदान करायचे का? करायचे तर कोणाला ?. शेवटी, निघालो एकदाचा आणि लोक'शाई' बोटाला लावुन परतलो. मतदानाचा हक्क बजावला. कसला हक्क? कोणाचा? आपला मतदान करायचा हक्क असतो की जे उमेदवार उभे आहेत निवडणुकीला, त्यांचा हक्क असतो आपल्याकडुन मत घ्यायचा. प्रश्न पडले होते.

असो. मतदान करत रहायचे. 'त्यातल्या त्यात बरा' निवडुन. आणि परिस्थिती सुधारेल. देशाची प्रगती होईल. अशी भाबडी स्वप्ने बघायची. हो. स्वप्न बघायचा हक्क मात्र आपण बजावायचा.

- शशांक.
Shashank
चित्रपट बघितल्यानंतर तो प्रेक्षकांना विचार करण्यास लावतो आहे की नाही यावरुन चित्रपटाच्या दर्जाचा अंदाज येतो. असाच एक दर्जेदार चित्रपट बघितला - स्लमडॉग मिलिअनेर. एक साधा चहावाला पोर्‍या (जमाल) हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर या कार्यक्रमात एक मिलीयन जिंकतो, आणि फसवणुकीच्या संशयावरुन त्याला पोलीसात दिले जाते. या कार्यक्रमात जिंकण्याएवढी माहीती तुला मिळाली कशी ? या प्रश्नाचे उत्तर जमाल देत असतो आणि त्याबरोबर त्याचे आयुष्य उलगडत जाते. जमाल आणि सलीम रहात असतात मुंबईतील एका झोपडपट्टीत. तिथेच त्याची लतिकाशी ओळख होते. एका दंगलीमधे त्यांची वाताहत झाल्यानंतर ते एका गँगच्या हाती लागतात. मुलांचे डोळे फोडुन त्यांना भिक मागायला लावणारे हे लोक आहेत असे त्यांच्या लक्षात आल्यावर सलीम व जमाल तेथुन पळ काढतात परंतु लतिका त्या गँगच्या तावडीत सापडते. इथुन पुढे, सलीमचा गुन्हेगारी जगताकडे प्रवास होतो. जमाल लतिकाला विसरु शकत नाही व तो तिला पुन्हा शोधुन काढतो. इथेच दोघा भावांमधे दरी पडते. सलीम पिस्तुलाच्या बळावर लतिकाचा गैरफायदा घेतो. मधे पुन्हा काही बर्ष गेल्यानंतर जमाल लतिकाला शोध घेतो पण लतिका आता जावेद नावाच्या मोठ्या गुंडाकडे असते. लतिका तिथुन सुटका होते का. जमालचे निरपराधित्व सिद्ध होते का ? आणि पुन्हा हु वॉन्ट्स टु बी अ मिलिअनेर च्या सेटवर येउन तो संपुर्ण जिंकतो का हे चित्रपटातच पाहणे उचित ठरेल.

चित्रपटात भारतातील गुन्हेगारी, झोपडपट्टीतले जीवन, गरीबी, दंगल या सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. चित्रपटातील पहील्या काही मिनीटातील दृष्यात, जमाल व सलीम मागे लागलेल्या हवालदारापासुन वाचण्यासाठी पळतात, तेंव्हा कॅमेरा त्यांच्या पाठीमागे पळवुन झोपडपट्टीचे दर्शन घडवले आहे. तसेच लहान मुलांचे डोळे फोडणारे दृष्य अंगावर काटा आणते. जमाल परदेशी पर्यटकांना स्थळे दाखवत असताना, त्यांच्या गाडीचे टायरसकट काही भाग चोरीला जातात, तेंव्हा जमालच्या तोंडी एक वाक्य आहे, इफ यु वाँट टु सी द रियल इंडिया, धिस इज रियल इंडिया.

चित्रपटात काही चुका आहेत. उदा. चित्रपटात कधी हिंदीत संवाद आहेत तर कधी इंग्लीश. जमालच्या इंग्लीशचे अक्सेंट भारतातले नक्कीच वाटत नाही. सलीम पिस्तुल कोठुन मिळवतो ते दाखवलेले नाही. तसेच त्यासंबंधी एक प्रश्न जमालला विचारला जातो त्याचे उत्तर जमाल बरोबर देउ शकतो हे पटत नाही. त्याच प्रमाणे मुंबईतल्या झोपडपट्टीतील शाळा इंग्लीश मिडीयमची असु शकते का हा प्रश्न पडतो.

असे असले तरी चित्रपट तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट आहे. चित्रपटाला चार गोल्ड्न ग्लोब ऍवार्डस मिळाले आहेत. त्यात उत्कॄष्ट संगीत चे ऍवार्ड आपल्या ए.आर. रेहमानला मिळाले याचा प्रत्येक भारतीयाला आनंद होईलच. चित्रपटात जो भारत दाखवलेला आहे तोच आणि तेवढाच फक्त 'रियल इंडिया' नाही, हे पाश्चात्यांना कळले आहे की नाही हे मला माहीत नाही. परंतु, प्रगतीची स्वप्ने पाहताना, यात दाखवलेला रियल इंडिया अस्तित्वात आहे याचा विचार हा चित्रपट करायला लावतो यात शंका नाही.